Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पाटण गावात मागील महिन्यांत घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर बाधित नागरिकांच्या मदतीसाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतला आहे. दरडग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह त्यांनी मुंबईतील सेवासदन निवास येथे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाटणमधील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. दरडग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळावी, नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत भेगडे यांनी पाटण गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, दरडीमुळे निर्माण झालेला धोका आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली. दरडग्रस्तांना शासकीय मदत आणि प्रशासनाचा त्वरित प्रतिसाद मिळावा, यासाठी त्यांनी शासनाकडे ठोस पाठपुरावा केला.
या चर्चेची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी तात्काळ संपर्क साधत आवश्यक सूचना दिल्या. बाधित कुटुंबांना तातडीने दिलासा देणे, पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीदरम्यान दरडग्रस्त भागातील भौगोलिक परिस्थिती, संभाव्य धोके, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन पुनर्वसनाचा आराखडा यावरही सखोल चर्चा करण्यात आली. प्रभावित कुटुंबांना कोणतीही अडचण येऊ नये आणि शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने सातत्याने समन्वय ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच दरडग्रस्त नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे सुरक्षित पुनर्वसन व्हावे आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासन सकारात्मक असून प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री महाजन यांनी दिली.
“पाटणमधील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणे हीच आमची प्राथमिकता आहे. संकटाच्या या काळात कोणतेही कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. दरडग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळवून देण्यासोबतच त्यांचे सुरक्षित पुनर्वसन होईपर्यंत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. नागरिकांना या कठीण प्रसंगी कधीही एकटे पडू देणार नाही.” – बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री)
दरम्यान, पाटण गावातील ग्रामस्थांनीही बाळा भेगडे यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले. घटना घडल्यानंतर त्यांनी दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवत संबंधित मंत्र्यांची तातडीने भेट घेतल्याने मदत प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. “संकटाच्या काळात आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आमचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचवला. त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
– तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द
– पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?
