दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या तळेगाव एमआयडीसी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. नवलाख उंबरे परिसरात असणाऱ्या एका कंपनीत गॅस गळती झाल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन कामगार गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत.
तळेगाव एमआयडीसी परिसरातील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅस गळतीची ही गंभीर घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तिघेजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील एका विभागात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना दुपारच्या सुमारास कार्बन डायऑक्साइड वायूची गळती सुरू झाली. काही क्षणांतच परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेत पाच कामगार वायूच्या संपर्कात आले. यातील गणेश उंबरे आणि वैभव थोरात हे दोघे अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने मदत करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ऑक्सिजनअभावी आणि वायूचा परिणाम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली. प्लांटमधील इतर कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच एमआयडीसी सुरक्षा विभाग, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी कामगारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


