Dainik Maval News : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) ही ऑनलाइन खत वितरण प्रणाली राज्यातील शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) या नवीन ऑनलाइन खत वितरण प्रणालीमुळे शेतकरी, कृषी सेवा केंद्र चालक अडचणीत सापडले आहेत. ओटीपी, थंब मॅच, क्यूआर कोड, सर्व्हर डाऊन आणि इंटरनेट समस्यांमुळे खत खरेदीची प्रक्रिया संथ झाली असून अनेक शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ही ऑनलाइन प्रणाली रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन खत विक्री सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल (स्मार्ट फोन) नाहीत, तर अनेकांना तांत्रिक साक्षरते अभावी ॲप वापरणे कठीण जात आहे. शासनाच्या नवीन निर्देशानुसार, खत खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाइन बुकिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोणत्या शेतकऱ्याला नेमकी किती खताची मात्रा मिळणार, याचे नियंत्रणही प्रणालीद्वारे होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नोंदणी प्रक्रियेसाठी आधारकार्ड, फार्मर आयडी आणि सातबारा अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यातच वारंवार सर्व्हर डाऊन होणे आणि इंटरनेटच्या समस्यांमुळे ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तसेच, यामुळे शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी या नवीन जाचक नियमांमुळे अधिकच भरडला जात आहे.
शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांच्या मते, नव्या ॲपचा वापर करण्यासाठी उच्चगती इंटरनेट आवश्यक आहे. अनेक गावांमध्ये अजूनही नेटवर्कची समस्या कायम असल्याने ॲप सुरळीत चालत नाही. याशिवाय ॲपमधील बहुतांश माहिती इंग्रजी भाषेत असल्याने सामान्य शेतकऱ्यांना प्रक्रिया समजणे कठीण जात आहे. परिणामी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना वारंवार कृषी सेवा केंद्रांचे फेरे मारावे लागत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


