Dainik Maval News : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) मावळ तालुक्यातील बौर, करूंज व ब्राम्हणवाडी या गावांतील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद करण्यात येतील. प्रस्तावित प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयात तक्रारी नोंदवाव्यात, त्यावर योग्य कार्यवाही करू, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांची मंगळवारी बैठक झाली. प्रकल्पाबाबत वरिष्ठांना सविस्तर अहवाल सादर करून अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान मोजणी प्रक्रियेला विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केले. भूसंपादन प्रक्रियेत योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. एमआयडीसीमुळे या भागाची मोठ्या प्रमाणावर विकास होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
सदर बैठकीला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, भारतीय किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भरत मोरे, संतोष दळवी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील मौजे बऊर, करुंज, ब्राह्मणवाडी या भागातील स्थानिक शेतकऱ्यांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या जमिनींच्या दस्ताची नोंदणी बंद व्हावी, अशी मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी तात्काळ बऊर हद्दीतील दस्त नोंदी थांबविण्याचे आदेश दिले. बऊर, ब्राम्हणवाडी, करुंज या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत अशी खात्री देतो, असे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर