Dainik Maval News : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज जयंतीचे १५० वे वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे १३५ वे वर्ष आणि यासह चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष असल्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ पर्यंत “समता सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सोमवारी, दि. १३ एप्रिल रोजी वडगाव नगरपंचायत कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचे “समाजातील समता व बंधुता”या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी भूषविले. सदर कार्यक्रमावेळी नगरसेवक अजय भवार, नगरसेविका वैशाली सोनवणे, मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम आणि वडगाव नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत नगरसेवक अजय भवार यांनी केले.
व्याख्याते प्रभाकर ओव्हाळ यांनी आपल्या ओघवत्या शैलीत महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांनी समाजासाठी, स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च पदस्थ असूनही न्यायालयाच्या शिष्टाचाराचे पालन करण्यासाठी ते वडगाव कोर्टात आले. त्यावेळी अशा महान नेत्याच्या व्यक्तिमत्वाचा वेगळाच पैलू दिसून येतो.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कामामुळेच आज आपण शिक्षण घेत आहोत, समाज प्रगती करत आहे. संत गाडगे महाराज यांनी वडगाव शहरातही कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे कार्य केले. हे सर्व महापुरुष एकेकाळी वडगाव शहरात येऊन गेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपला जन्म झाल्याने आपण खरंच भाग्यवान आहोत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
वडगाव शहर हे एक ऐतिहासिक शहर असून आपल्या या शहराचा इतिहास लिहिला जावा आणि वडगाव शहरात साहित्यिक संस्कृती रुजावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी समाजात समता निर्माण होण्याच्या दृष्टीने वडगाव शहरातील शेवटच्या नागरिकापर्यंत सर्व योजना पोहोचविण्यासाठी वडगाव नगरपंचायत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
डॉ. प्रविण निकम, मुख्याधिकारी यांनी वडगाव नगरपंचायत शहराच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा देतच आहे. आता वडगावची वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही आपले योगदान देत राहील याची ग्वाही दिली. त्यांनी व्याख्यात्यांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा चव्हाण, कार्यालय अधिक्षक यांनी केले. समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या थोर विचारवंतांच्या विचारांना मनात जागृत ठेवून कार्यरत राहण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर
– जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा
– वडगावात स्व.पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा ; सात जोडप्यांचे होणार शुभमंगल सावधान